मुंबई: काऊंन्सिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी - बारावीच्या परीक्षेचे निकाल सोमवारी जाहीर करण्यात आले असून, या निकालात मुलींची कामगिरी चांगली असल्याची माहिती बोर्डाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
गेल्या वर्षीप्रमाणे यंदादेखील बोर्डाने परीक्षेत टॉप करणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली नसल्यामुळे जीवघेणी स्पर्धा यावेळी थांबली. मंडळाचा दहावीचा निकाल ९९.४७ टक्के इतका लागला आहे, तर बारावी परीक्षेचा निकाल ९८.१९ टक्के लागला आहे.
दहावीच्या (आयसीएसई) परीक्षेला देशभरातून बसलेल्या २,४३,६१७ विद्यार्थ्यांपैकी २,४२,३२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेला १,१३,१११ मुली बसल्या होत्या. त्यापैकी १,१२,७१६ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. हे प्रमाण ९९.६५ टक्के आहे, तर १,३०,५०६ मुलांपैकी १,२९,६१२ मुलगे उत्तीर्ण झाले आहेत. हे प्रमाण ९९.३१ टक्के इतके आहे. मुलींची कामगिरी मुलांच्या तुलनेत चांगली राहिली आहे.