बीड: माजलगाव तालुक्यातील ब्रह्मनाथ तांडा या अडीशे ते तीनशे लोक वस्ती असणाऱ्या तांड्यावरील नागरिकांनी तांड्यावरील असुविधा बाबत प्रशासनाला वेळोवेळी निवेदन दिले. मात्र याची दखल न घेतल्यामुळे तांड्यावरील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. या संदर्भात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले होते याची माहिती बंजारा समाजाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व्ही.जे.एन.टी. राज्यप्रमुख रविकांत राठोड यांना मिळताच त्यांनी ब्रह्मनाथ तांडा येथील नागरिकांशी संवाद साधत पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी तांड्यावरील लोकांचे बोलणे करून दिले तांड्यावरील सर्व समस्या लोकसभा निवडणुकीनंतर सोडवल्या जातील असे आश्वासन धनंजय मुंडे यांच्याकडून मिळाल्यानंतर ब्रह्मणाथ तांड्यावरील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार पाठीमागे घेतला.
मागील 25 वर्षापासून तांड्याला रस्ता नसल्याने अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे याची दखल रविकांत राठोड यांच्यामार्फत पालकमंत्र्यांनी घेतली व भविष्यात कायमस्वरूपी तांड्याला रस्ता देणार असल्याचे आश्वासन दिल्याने लोकसभा निवडणुकीवर घातलेला बहिष्कार ब्रम्हनाथ तांडा येथील नागरिकांनी परत घेतला आहे. नागरिकांची समजूत घालत निवडणुकावर घातलेला बहिष्कार पाठीमागे घेतल्याबद्दल बंजारा समाजाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व्ही.जे.एन.टी.सेल चे राज्यप्रमुख रविकांत राठोड यांनी गावातील नागरिकांचे आभार मानले असून पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली गाव तांड्यावरील नागरी व मूलभूत सुविधा लवकरच पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन रविकांत राठोड यांनी दिले आहे.