कल्याण: सोमवारी लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले मतदान उत्साहात पार पडले असतांनाच अनेक मतदारांच्या आनंदावर मात्र मतदार यादीत नाव नसल्याने पाणी फेरले गेल्याचे पाहायला मिळाले. निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या मतदार याद्यांच्या घोळामुळे अनेक नागरिकांना मतदानापासून वंचित राहावे लागले. यात अमेरिकेतून अवधतू दातार हा नागरिक दर पाच वर्षांनी मतदान करण्यासाठी येत असतो. यावेळीही तो आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अमेरिकहून आला होता. मात्र, मतदार यादीत नावच नसल्याने त्याला मोठा मनस्ताप सहन करावा लागला आणि मतदानापासून त्याला वंचित राहावे लागले.
अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला आणि पुरुष यांनी मतदार यादीत आपले नाव नसल्याच्या तक्रारी केल्या. तसेच गेल्या वेळेला आम्ही आमचा मतदानाचा अधिकार बजावला असताना यावेळी अचानक आमची नावे यादीतून कशी काय वगळण्यात आली? असा संतप्त सवाल या नागरिकांनी विचारला.