पालघर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सोमवारी पालघरच्या मनोर येथील सायलेंट रिसॉर्ट येथे प्रचारसभा झाली. या मतदारसंघात ठिकाणी महायुतीचे भाजपा उमेदवार डॉक्टर हेमंत विष्णू सावरा यांचा मुकाबला उबाठा शिवसेनेच्या उमेदवार भारती कामडी यांच्याशी होणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. आता उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसला जवळ केले. बाळासाहेब आज असते तर त्यांनी यांना जोड्याने मारले असते, अशा तिखट शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पालघर हा आपला बालेकिल्ला आहे. हा दिघे साहेबांचा बालेकिल्ला आहे. तो आपल्याकडेच राहील. विरोधक गत अनेक वर्षांपासून राहुल गांधी यांचे लाँचिंग करत आहेत. पण त्यांचे लॉचिंग होत नाही, असे शिंदे म्हणाले. ही निवडणूक पालघरपुरती मर्यादित नाही. ही देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारी निवडणूक आहे. आपल्याला नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे आहे. उमेदवार कुणाचा यापेक्षा उमेदवार महायुतीचा असल्याचे लक्षात घेऊन मतदान करायचे आहे. आमचे सरकार सर्वसामान्यांचे सरकार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.