मुंबई: प्रसार माध्यमाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हे स्पष्ट केलं आहे, की दक्षिण मुंबईमधील उमेदवाराबाबत वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील आणि येत्या काही दिवसात तो निर्णय येण्याची शक्यता आहे. महायुतीमधील सर्व पक्षांची भक्कम एकजूट असून आम्ही या मतदारसंघात १००% जिंकणार आहोत, असा विश्वास मंत्री लोढा यांनी व्यक्त केला.
सदर मतदारसंघात कोणत्या उमेदवाराला संधी दिली जाईल याबाबत बोलताना मंत्री लोढा म्हणाले, "आमचा उमेदवार ठरलेला आहे, आणि त्यांचं नाव आहे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी! ते आमचे एकमेव उमेदवार असून, त्यांच्या नेतृत्वात आम्ही सर्वजण त्यांचे प्रतीक म्हणून उभे राहणार आहोत. गेल्या १० वर्षांच्या काळात त्यांनी देशाला उन्नीतीच्या मार्गावर नेलं!, त्यामुळे जनता त्यांना भरघोस मतांनी निवडून देईल. त्यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे सर्वच त्यांच्या सोबत उभे राहतील."
२०१४ मध्ये, २०१९ मध्ये ज्यांनी मोदीजींचा फोटो दाखवून मते मागितली, निवडून आले त्यांनी कशाप्रकारे विश्वासघात केला हे सर्वानाच माहिती आहे. मविआ सरकारच्या काळात याच दक्षिण मुंबईमध्ये याकूबच्या कबरीची मजार करण्याचा प्रयत्न झाला. काही दिवसांपूर्वीच भोईवाडा पोस्ट गल्ली परिसरात झालेला प्रकार सर्वांना माहिती आहे. बंगालमध्ये संदेशखली करणाऱ्या शेख शाहजहानसारखेच लोकं आता इथे सुद्धा तयार होत आहेत काय?, असा प्रश्न पडतो. मालवणीचा पॅटर्न दक्षिण मुंबईमध्ये राबवण्याचा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. दक्षिण मुंबईला मालवणी होऊ देणार नाही असे मंत्री लोढा यांनी या मुलाखतीत स्पष्ट केले.