मुंबई: मराठ्यांना देण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्राविरोधात दाखल जनहित याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. ओबीसी कल्याण संघटनेचे अध्यक्ष मंगेश ससाणे यांच्यामार्फत ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय व न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.
या याचिकेला विरोध करणारे अर्ज ही मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाले आहेत. या अर्जाची प्रत अन्य पक्षकारांना अद्याप मिळालेली नाही. ही प्रत उपलब्ध करून देण्याचे निर्देशही न्यायालयाने या अर्जदारांना दिले आहेत.
ससाणे यांच्या याचिकेवर प्रत्युत्तर सादर केले आहे का? अशी विचारणा मुख्य न्यायमूर्तींनी राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांना केली. त्यावर या याचिकेचे प्रत्युत्तर सादर झालेले नाही, असे महाधिवक्ता सराफ यांनी स्पष्ट केले. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ जूनपर्यंत तहकूब केली.