मुंबई: अखिल भारतीय मराठा महासंघ राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा साजरा करणार आहे. सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालये, ग्रामपंचायतीसह प्रत्येक गावांत छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा साजरा करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी मराठा महासंघाचे सरचिटणीस संभाजी दहातोंडे पाटील यांनी शासनाकडे केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी ६ जुन रोजी छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषेक सोहळ्याचे यंदाचे ३५० वर्ष आहे. त्याचे औचित्य साधून यंदा अखिल भारतीय मराठा महासंघ देशभरात हा सोहळा शक्य त्या ठिकाणी साजरा करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळ्याचे यावर्षीचे ३५० वे वर्ष आहे याचा आपल्या सर्वांना आनंद आहे. हा सोहळा अखिल भारतीय मराठा महासंघ, राज्य सरकार शक्य त्या ठिकाणी साजरा करणार आहेच, परंतू यंदाचे राज्यभिषेकांचे ३५० वे वर्ष असल्याने अखिल भारतीय मराठा महासंघाचाही जास्तीत जास्त गावांत हा कार्यक्रम साजरा व्हावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषेक सोहळा दिनानिमित्त हा कार्यक्रम राज्यातील सर्व सरकारी कार्यालये, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, सोसायट्या तसेच सर्व संस्थाचे सरकारी, निमसरकारी व खाजगी कार्यालये, प्रत्येक गावांत साजार व्हावा त्या अनुषंगाने राज्य सरकारमार्फत सूचित करण्याबाबत आपल्या स्तरावर सूचना द्याव्या.