अहिल्यानगर: अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात शिर्डी येथे पकडण्यात आलेल्या चार भिक्षेकरांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी शिर्डी येथे नगरपंचायत आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ५१ भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेतलं होतं. शिर्डी प्रशासनाने दर दोन महिन्याला भिकारी धरपकड मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत भिक्षेकऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. याच कारवाईदरम्यान ज्या भिक्षेकरांना ताब्यात घेतलं होतं. त्यापैकी काही भिक्षेकरांना विसापूर येथील कारागृहामध्ये ठेवण्यात आलं होतं. तर उपचाराकरिता काही भिक्षेकऱ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्यातील चार भिक्षेकऱ्यांचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आलं आहे.
मृतांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. या भिक्षेकऱ्यांना एका रूममध्ये बांधून ठेवण्यात आलं होतं. त्या रूमला टाळं ठोकण्यात आलं होतं, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. संबंधित रुग्णांना साधं पाणी देखील देण्यात आलेलं नव्हतं आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे उपचार सुरू नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसण्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.
अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात आणलेल्या भिक्षेकरांपैकी एका भिक्षेकराने माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं, की शिर्डीमध्ये भंगार गोळा करताना आम्हांला ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर आम्हाला विसापूर मध्ये हलवलं. तिथून जिल्हा रुग्णालयात आणलं. आम्हाला एका खोलीत ठेवलं त्यानंतर आम्ही पाण्याची मागणी केली तरी कुणीही साधं पाणी देखील दिलं नाही, कुठलीही सेवा देण्यात आली नाही. तसेच विसापूर येथे मारहाण झाल्याची माहिती संबंधित भिक्षेकऱ्याने दिली आहे.
अहिल्यानगर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, की "विसापूर येथून आलेल्या रुग्णांची प्रकृती आणि त्यावेळेसच चिंताजनक होती. काहींना क्रोनिक अल्कोहोलिक सिम्पटम्ससह मनोविकारासारखे आजार होते. यामध्ये ज्या रुग्णांचा मृत्यू झालेला आहे, त्यांना पूर्ण उपचार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूर्वी प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णांना पुणे येथील ससून रुग्णालयात उपचाराकरिता पाठवण्यात येत आहे. परंतु या रुग्णांसोबत कोणीही नातेवाईक नसल्यानं ससून इथे या रुग्णांना भरती करून घेतले जात नाही. ते पुन्हा जिल्हा रुग्णालयात येतात. अल्कोहोलमध्ये विड्रॉल सिम्प्टम्समध्ये असल्यामुळं त्यांचे हातपाय सारखे हलत असतात. त्यामुळं उपचाराला अडचणी येतात. तसेच काही जण पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्यानं त्यांचे बोट बांधून ठेवले आहे."