सांगली: बंगाल राज्यातील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील हिंदूंवर झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात येथे दुपारी १२ वाजता हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी बंगालचा बांगलादेश होऊ देऊ नका, तसेच बंगाल येथील हिंदूंच्या रक्षणासाठी वेळ पडल्यास लष्कर घुसवा, अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाच्या संतप्त झालेल्या हिंदुत्वनिष्ठांनी केली. या वेळी हिंदू एकता आंदोलनाच्या हिंदुत्वनिष्ठांनी ‘जागे व्हा, जागे व्हा, हिंदूंनो जागे व्हा, बंगालमधील हिंदूंवर होणारे अत्याचार थांबलेच पाहिजे, जय श्रीराम’, अशा जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
या वेळी बोलतांना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा मा. आ. नितीन शिंदे म्हणाले, की ‘बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात निघालेल्या मोर्च्याच्या वेळी हिंदूंच्या घरावर मोठी आक्रमणे करून हिंदूंची घरे पेटवली जातात, मंदिरांवर आक्रमणे करून देवतांच्या मूर्ती फोडल्या जात आहेत. हिंदूंना ‘बंगाल सोडून जा’, अशा धमक्या दिल्या जातात. त्यांच्यावर सशस्त्र आक्रमणे करून त्यांना घायाळ केले जाते. या विधेयकाला विरोध करणारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुसलमानांच्या मतासाठी या सर्व गोष्टींना पाठिंबा देत आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील ६५० कुटुंबांवर घर सोडून जायची वेळ आली आहे. केंद्र सरकारने या विषयात हस्तक्षेप करून बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीचे सरकार विसर्जित करून राष्ट्रपती राजवट लागू करावी. देशद्रोही दंगलखोरांना चिरडण्यासाठी लष्करी बळाचा वापर करावा. राज्यातील हिंदुत्वनिष्ठ सरकारने देशाच्या पंतप्रधानांकडे बंगालच्या हिंदूंचे संरक्षण करण्यासाठी आग्रह धरावा’’, अशी मागणी त्यांनी केली.