अहिल्यानगर: गेल्या दोन ते चार दिवसांमध्ये राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली. नदी दुथड्या भरून वाहत आहेत. त्यामुळे नदी काठावरील असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामधील कोपरगाव तालुक्यात एका महिलेने आपली अंगावरील साडीच्या मदतीने दोन सख्ख्या भावांना नदीपात्रात बुडता - बुडता वाचवलं आहे.
कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीपात्रामधील पाण्याची पातळी वाढायला लागल्याने शेतकऱ्यांना आपल्या विद्युत मोटारी सुरक्षित काढण्यासाठी नदीपात्रात जीव धोक्यात घालून उतरावे लागत आहे. कोपरगाव तालुक्यातील कारवाडी - हंडेवाडी येथील तीन सख्खे भाऊ आपली मोटार काढण्यासाठी मंजूर येथील गोदावरी नदीच्या पात्रात उतरले होते. काही वेळात दुर्देवाने नदीपात्रात पाण्याची पातळी अचानक वाढली. पाण्याच्या प्रवाहामुध्ये तीनही तरूण वाहून गेले. त्यावेळी तिथे शेळ्या चारण्यासाठी ताराबाई पवार आणि त्यांचे पती छबुराव पवार यांनी त्यांना बुडताना पाहिलं. तीन सख्ख्या भावांना बुडतांना पाहून ताराबाई यांनी वेळ न घालवता आपल्या अंगावरील साडी काढली. कोणताही विचार न करता तरुणांना वाचवण्यासाठी आपल्या अंगावरील साडीचा दोर करत तरूणांना मदत केली. त्यावेळी संतोष भीमाशंकर तांगतोडे, प्रदीप भीमाशंकर तांगतोडे आणि अमोल भीमाशंकर तांगतोडे यांच्यामधील दोघेजण वाचले. मात्र संतोष तांगतोडे हे खोल पाण्यात गेल्याने त्याला वाचवण्यात अपयश आलं.
ताराबाई यांनी प्रसंगावधान दाखवत दोन भावांचा जीव वाचवला. ताराबाई यांच्या धाडसाची कोपरगाव पंचक्रोशीमध्ये चर्चा असून त्यांचं कौतुक होत आहे. ताराबाई यांनी जर वेळीच प्रसंगावधान साधून मदत केली नसती, तर तांगतोडे घरातील तीनही भाऊ एकाच वेळी नदीपात्रात बुडाले असते. परंतु ताराबाईंच्या या धाडसी पाऊलामुळे दोन जीवांना जीवनदान मिळाले आहे.