छत्रपती संभाजीनगर: वैजापूर तालुक्यातील बाभूळगाव खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप केला जाणारा आहार बनविण्यासाठी मुदतबाह्य व निकृष्ट दर्जाचे खाद्यतेल वापरले जात असल्याचा प्रकार शनिवारी युवा सह्याद्री संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी संबंधितांविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
युवा सह्याद्री संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी या शाळेत अचानक भेट दिली असता त्यांना पोषण आहार बनविण्यासाठी कालबाह्य झालेले खाद्यतेल वापरले. जात असल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात पदाधिकाऱ्यांनी मदतनीस महिलेकडे चौकशी केली असता आपण याबाबत मुख्याध्यापकांना विचारणा करावी, असे उत्तर त्यांनी दिले. हे तेल दहा महिन्यांपूर्वीचे म्हणजेच २६ सप्टेंबर २०२३ रोजी कालबाह्य झालेले आहे.
तरी त्याचा वापर शालेय पोषण आहारात केला जात असून हा प्रकार मुलांच्या जीविताशी खेळण्यासारखा आहे. याला मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.