कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड आवारातील दर्ग्यावर पूर्वापार चालत आलेल्या पक्षी व प्राण्यांचा बळी देण्याच्या प्रथेवर प्रशासनाने घातलेली बंदी उठली आहे. या ठिकाणी बकरी ईद आणि उरूसला कुर्बानी देण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.बकरी ईद आणि त्यापुढे चार दिवस चालणा-या ऊरूसा दरम्यान पशुबळी देण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे. 17 जून ते 21 जून दरम्यान विशाळगडावर हा उत्सव चालणार आहे.
गेल्या वर्षी १ फेब्रुवारीला या प्रथेवर सरकारने बंदी घातली होती. पुरातत्त्व विभागाने याबाबत आदेश काढला असून परमेश्वरासाठी बळी देण्याच्या नावाखाली प्राणी-पक्ष्यांच्या बेकायदा कत्तलीवर बंदी घातल्याचे आदेश पुरातत्त्व विभागाच्या उपसंचालकांनी काढले होते. त्यानंतर विविध प्रशासनांनी बंदीचे आदेश काढले. याविरोधात हजरत पीर मलिक रेहान मीरा साहेब दर्गा ट्रस्टने ॲड. सतीश तळेकर, ॲड. माधवी अय्यपन यांच्यामार्फत याचिका केली असून त्यावर सुनावणी घेण्यात आली. सुनावणीनंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. काल (ता. १४) न्या. बी. पी. कोलाबावाला यांनी हा निकाल जाहीर केला आणि याचिकाकर्त्यांची मागणी मान्य केली.
या निर्णयामुळे सकल हिंदू समाजामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्या छत्रपतींनी, मावळ्यांनी स्वराज्यासाठी गडावर रक्त सांडले, त्या गडांचे संवर्धन करण्याचे सोडून तिथे अशा प्रकारचे निर्णय घेतले जात आहे, हे अतिशय दुःखदायक आहे. महाराष्ट्रात नक्की हिंदुत्ववादी सरकार आहे का? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे.