मुंबई: मुंबईतील विलेपार्ले भागात असलेले जुने पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर मुंबई महानगरपालिकेने दोन दिवसांपूर्वी पाडले होते. मुंबई पालिकेच्या या कारवाईनंतर देशभरातील जैन समुदाय संतप्त झाला आहे. मुंबई मनपाच्या कारवाईविरोधात जैन समाजाकडून शनिवारी अहिंसक रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने जैन समाज बांधव सहभागी झाले. त्यांच्या हातात ‘मंदिर तुटा, हौसला नाही’, असे फलक होते. मंदिर पुन्हा बांधून देण्याची मागणी या लोकांनी केली आहे.
जैन समाजाच्या या आंदोलनात जैन समाजातील महिलासुद्धा मोठ्या संख्येने उतरल्या आहेत. आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी बीएमसीची कारवाई योग्य नसल्याचे म्हटले आहे. मनपाने केलेल्या कारवाईमुळे माफी मागावी आणि मंदिर पुन्हा बांधून द्यावे, अशी मागणी समाजबांधव करत आहे.
विले पार्ले भागातील नेमिनाथ कोऑपरेटीव्ह हाउसिंग सोसायटी परिसरात ९० वर्ष जुने जैन मंदिर होते. हे मंदिर पाडण्यासाठी बीएमसीने नोटीस दिली होती. त्या विरोधात जैन समाज न्यायालयत गेला होता. कनिष्ठ न्यायालयाने जैन समाजाची याचिका फेटाळली. त्यानंतर जैन समाजाने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहता बीएमसी प्रशासनाने घाई गर्दीत मंदिर पाडले, असा आरोप जैन समाजाकडून करण्यात येत आहे.