जळगाव: वर्ष 1925 मध्ये ब्रिटिश सरकारने मुसलमानांची धार्मिक संपत्ती संरक्षित करण्यासाठी ‘वक्फ कायदा’ अस्तित्वात आणला होता; स्वातंत्र्यानंतरही मुसलमानांचे लांगूलचालन करणार्या काँग्रेस सरकारने वक्फ कायद्यात वेळोवेळी सुधारणा करत ‘वक्फ बोर्डा’ला पाशवी अधिकार दिले. वर्ष 1995 आणि वर्ष 2013 मध्ये काँग्रेस सरकारने या कायद्यात केवळ मुसलमानच नव्हे, तर हिंदु, शीख, बौद्ध, ख्रिस्ती अशा सर्व धर्मीयांची कोणतीही संपत्ती ही वक्फ बोर्डाची संपत्ती म्हणून घोषीत करण्याचे अत्यंत भयानक अधिकार वक्फ बोर्डाला दिले. या कायद्याचा दुरुपयोग करून देशभरात बलपूर्वक भूमी बळकावून ‘लँड जिहाद’ केला जात आहे.
भारत सरकारच्या ‘भारतीय सेने’कडे सर्वाधिक 18 लाख एकर, ‘भारतीय रेल्वे’कडे 12 लाख एकर भूमी आहे. या दोघांच्या नंतर देशभरात तिसरी सर्वांत मोठी संपत्ती वक्फ बोर्डाकडे आहे. वर्तमानात वक्फ बोर्डाकडे 8 लाख एकरहून अधिक भूमीची मालकी आहे. हे असेच चालू राहिले, तर काही वर्षांत भारतातील सर्वाधिक भूमी वक्फ बोर्डाची झालेली असेल आणि पुन्हा एकदा एक मोठा भूभाग गिळंकृत करून भारतच्या पोटात नवा पाकिस्तान निर्माण होईल. असे असतांना राज्य शासनाने नुकतीच या वक्फ बोर्डाला १० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे, हे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे हे अनुदान देण्याचा निर्णय मागे घ्यावा आणि राज्यातील वक्फ संपत्तीचा चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज शिवतीर्थ, जळगाव येथे घेण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनात करण्यात आली.
यासोबत भारत ही साधू-संतांची भूमी आहे. संतांनी संपूर्ण विश्वामध्ये जाऊन भारतीय संस्कृती, धर्म, ज्ञान, कला, सभ्यता, सदाचार, तसेच भगवद्भक्ती शिकवूण समाजाला आदर्श जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. असे असतांना अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खान, तसेच ‘यशराज फिल्म्स’ यांच्या ‘महाराज’ या चित्रपटातून साधूसंतांना दुराचारी, गुंड दाखवून त्यांची बदनामी करण्यात आली आहे. त्यामुळे या चित्रपटावर तत्काळ बंदी घालावी, अशी मागणीही या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.
या आंदोलनात हिंदु राष्ट्र सेना, योग वेदान्त समिती, वारकरी संप्रदार, हिंदु महासभा, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, हिंदु जनजागृती समिती, हिंदु विधिज्ञ परिषद, करणी सेना आदी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनानंतर सदर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले .