नागपूर: पंडीत दीनदयाल उपाध्याय यांचे चरित्र प्रेरणादायी असून, त्यांच्या चारित्र्यापासून प्रेरणा घेत प्रत्येकाने त्यातील काही अंश जरी स्वीकारले तरी जगाला दिशा देणारा भारत उभा राहील, असे प्रतिपादन प. पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे केले. आपल्याला समाजात जसा बदल अपेक्षित आहे, तसे प्रत्येकाने स्वत: बनायला हवे, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. लेखक-कवी दयाशंकर तिवारी ‘मौन’ लिखित ‘माँ भारती के सारथी : दीनदयाल उपाध्याय’ या महानाट्याच्या मोर हिंदी भवन येथे आयोजित प्रकाशन सोहळ्यात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून कराड येथील कृष्णा इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसचे प्रमुख सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, माजी महापौर दयाशंकर तिवारी आणि लेखक-कवी दयाशंकर तिवारी ‘मौन’ उपस्थित होते.
भारतीय संस्कृती आणि परंपरेचे महत्त्व स्पष्ट करताना सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, ‘जगण्यासाठी संघर्ष हे तत्व मानून मनुष्य जीवन सुरू आहे. त्यावर उपाय शोधण्यासाठी आजवर विविध प्रयोग झालेत; पण जीवनात सुख, शांती निर्माण करण्यात ते सर्व अपयशी ठरले. दुसरीकडे परमोच्च बिंदू गाठत असलेला भौतिक विकास मानवतेला विनाशाकडे घेऊन जातो आहे, असे जगभरातील चिंतक मानतात. या पृष्ठभूमीवर सर्व समस्यांचे उत्तर आपल्या भारतीय परंपरेत आढळते.
भारताने सर्व प्रकारचे विचार स्वीकारले. भूतकाळात कुणालाही नाकारले नाही. येथे आस्तिक आणि नास्तिक असे दोन्ही दर्शन एकत्र नांदतात. त्या सगळ्यांचा स्वीकार भारताने केला. विविधता मिटवून जबरदस्तीने एकता निर्माण करण्याऐवजी विविधतेला स्वीकारत आणि आपण सर्व एक आहोत हे मानत जगण्याची परंपरा भारतात आहे, याकडेही प. पू. सरसंघचालकांनी लक्ष वेधले.
महात्मा गांधी यांनी मांडलेल्या रामराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार झाली असती तर कदाचित पंडीत दीनयाल उपाध्याय यांच्या एकात्म मानवतावादाची आवश्यकता राहीली नसती, असे प्रतिपादन यावेळी बोलताना डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले. दयाशंकर तिवारी यांनी पंडीत दीनयाल उपाध्याय यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगत त्यांच्या साधेपणावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक अतुल द्विवेदी यांनी तर सूत्रसंचालन अनिल मालोकर यांनी केले. आभार अभिषेक तिवारी यांनी मानले.