मुंबई: राज्य सरकारकडून ठाण्यातील मीरा भाईंदर परिसरात असलेल्या बालेशाह पीर दर्ग्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारकडून बुलडोझर चालवण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने १० मे पर्यंत दर्गा पाडण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबईच्या मीरा भाईंदरमध्ये असलेल्या या दर्ग्याजवळ एक मशीद असून, येथे नमाज अदा केली जाते. उत्तन गावात एका टेकडीजवळ असलेले हे परगाह आता वादाचे कारण बनले आहे. हा खटला उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत, सरकारी जमीन आणि खारफुटीचे नुकसान करून दर्गा बांधल्याच्या आरोपांवर न्यायालय निर्णय देणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा दर्गा मीरा भाईंदरच्या चौक परिसरात आहे. त्या परिसरात १० हजार चौरस फूट जागेत एक दर्गा बांधण्यात आला आहे. आता या दर्ग्यावर बुलडोझर कारवाई केली जाणार आहे.
२०११ मध्ये, पोलिसांनी मीरा भाईंदर जिल्हाधिकाऱ्यांना एक गुप्त पत्र लिहिले होते, ज्यामध्ये दर्ग्याला सुरक्षेसाठी धोका असल्याचे वर्णन केले होते. दहशतवादी समुद्रमार्गे या भागात प्रवेश करू शकतात आणि दर्ग्यात लपू शकतात, अशी भीती पोलिसांना होती. त्यामुळे दर्ग्यावर तात्काळ कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली. नुकत्याच संपलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेते निरंजन डावखरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. दर्गा सुरक्षेसाठी एक मोठा धोका आहे आणि तो लवकरात लवकर हटवला पाहिजे, अशी मागणीही केली होती.