नवी मुंबई: हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे माजी संपादक ज्ञानेश महाराव यांना अटक करण्याची मागणी बजरंग दलाच्या वतीने वाशी पोलीस ठाण्यात एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, ज्ञानेश महाराव यांनी हिंदु धर्मियांचे आराध्य दैवत असलेल्या प्रभु श्रीराम, लक्ष्मण, सीतामाता आणि उर्मिला माता, तसेच श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी अपमानकारक वक्तव्य केले आहे. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावनांचा जाणीवपूर्वक अपमान करून समस्त हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणी ज्ञानेश महाराव आणि इतर यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
ज्ञानेश महाराव हे समाजात जातीय द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून यावरून दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. ‘यापुढे हिंदु धर्माच्या विरोधात कुणी टीका केल्यास त्याला चप्पल मारून धडा शिकवला जाईल’, अशी चेतावणी विश्व हिंदु परिषद मातृशक्ति कोकण प्रांत संयोजिका मनिषाताई भोईर यांनी दिली, तसेच आरोपीस लवकरात लवकर अटक न झाल्यास विश्व हिंदु परिषद पुन्हा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करेल, असे विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा सहमंत्री सरूप पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.