पुणे: महाराष्ट्रात असंख्य प्रथा आहेत पण ही 'पंढरीची वारी' म्हणजे प्रथा नाही तर आपल्या विठ्ठलाप्रती मनोभावे केलेली उपासना आहे. जी अखंड आणि अभंग सुरू आहे. वारीची परंपरा ही ८०० वर्षांपेक्षाही अधिक जुनी आहे. आज पुण्यातील भोसरी येथून श्री आदिशक्ती मुक्ताबाई पालखी रथ पंढरपूरकडे मार्गस्थ झाला आहे.
हजारो वारकरी विठ्ठल नामाच्या गजरात, टाळ - मृदंगाच्या गजरात, अभंग, हरिपाठ गात पंढरपूरकडे निघाले आहे. मुख्य पालखी रथामागे व रथाच्या पुढे वेगवेगळ्या गावांमधून आलेल्या पालख्या दिंडी क्रमांक प्रमाणे निघाल्या आहेत. अत्यंत प्रसन्न भक्तीमय वातावरणात पुणेकरांनी पालख्या बघण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने गर्दी केली आहे.
महाराष्ट्रातील विविध गावांमधून तसंच अगदी कानाकोपऱ्यातून लाखो भाविक विठ्ठलनामाचा गजर करत ही परंपरा आजही जपत आहेत. आषाढ आणि कार्तिक या दोन्ही एकादशीला ही वारी होते पण आषाढी एकादशीची वारी ही खूपच मोठी आणि महत्त्वाची असल्याचे सांगितले जाते.