रत्नागिरी: रत्नागिरी येथील वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी सकल हिंदू समाजाने उद्घाटनाचा निषेध करत काळे झेंडे दाखवले. सकल हिंदू समाजाने या कार्यालयाला विरोध असल्याचे स्पष्ट करत निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले होते. या कार्यालयाला भाजपनेही तीव्र विरोध केला होता. त्यामुळे पोलिसांच्या चोख बंदोबस्तात हा कार्यक्रम पार पाडावा लागला. या वेळी आंदोलकांनी मंत्री उदय सामंत यांनाही काळे झेंडे दाखवत वक्फ बोर्डाचे कार्यालय रद्द करावे, अशा घोषणा दिल्या.
पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र हिंदुत्ववादी कार्यकर्ते स्वत:च्या आंदोलनावर ठाम राहिले. रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुस्लिम समाजासाठी कुवारबाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनमध्ये वक्फ बोर्ड कार्यालय होत आहे. याच कार्यालयाचे ७ ऑक्टोबरला उद्घाटन करण्यात आले. या कार्यालयाला विरोध करण्यात आला.
पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे...
१. आमची भूमी ताब्यात घेऊन भारताला इस्लामिक देश बनवण्याचा वक्फ बोर्डाचा हेतू दिसतो.
२. आमचा कुठल्या धर्माला किंवा पंथाला विरोध नाही. आम्ही राजकीय पक्षाचेही समर्थन करत नाही; परंतु हिंदूंचे हित जो जपेल त्यालाच आम्ही साहाय्य आणि मतदान करणार आहोत.
३. केंद्र सरकाराने वक्फ बोर्डाच्या संदर्भात घटना दुरुस्तीसाठी भारतीय नागरिकांकडून लेखी सूचना मागवल्या होत्या. हे विधेयक संसदेत प्रलंबित आहे, असे असतांना रत्नागिरीमध्ये वक्फ बोर्डाचे कार्यालय कशासाठी होत आहे.
४. शिरगाव (ता. रत्नागिरी), पन्हळे (ता. राजापूर) आणि रत्नागिरीतील टिळक ग्रंथालयासह अन्य ठिकाणी अनधिकृत धर्मस्थळे बांधली जात आहेत. याची तक्रारही जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.