मुंबई: आज राज्य सरकारच्या वतीने विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीच शेवटची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. आजच्या बैठकीत मुंबई प्रवेशद्वारावरील टोलनाक्यांवर टोलमाफीची योजना जाहीर केली आहे. तसेच सरकारने जाहीर केलेल्या सर्व योजना कायमस्वरूपी असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
योजना कायमस्वरूपी...
या संदर्भात बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की मुंबईतील प्रवेशद्वारावरच्या टोलनाक्यांवर टोलमाफी व्हावी, यासाठी मी स्वतः आमदार असताना आंदोलन केलं आहे. या संदर्भात विविध पक्षांकडून आणि संघटनांकडून सातत्याने आंदोलनं होत होती. टोलमाफीची मागणी होत होती, त्यानुसार हा निर्णय आम्ही आज घेतलेला आहे. राज्य सरकारने आतापर्यंत अनेक निर्णय घेतलेत, ज्यामध्ये लाडकी बहीण योजना किंवा लाडका भाऊ योजना असेल त्यानंतर लाडका शेतकरी आणि आता आम्ही लाडका प्रवासी योजनेचासुद्धा निर्णय घेतलाय. यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि या योजना कायमस्वरूपी आहेत, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत १९ निर्णय घेतले असून, यामध्ये आणखी एका समाजासाठी महामंडळ स्थापण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे विविध समाजासाठी महामंडळ स्थापन करण्याचा सपाटा सरकारने सुरूच ठेवला असून, हे निर्णय म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय निर्णय आहेत, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनी व्यक्त केलंय. मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर हलक्या वाहनांसाठी माफ करण्यात आला असून, सोमवारी रात्री १२ वाजल्यापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तर आगरी समाजासाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम लागू करण्यात येणार आहे.