मुंबई: जम्मू - काश्मीरच्या पहलगामध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश आहे, तर दोन परदेशी नागरिकांना देखील दहशतवाद्यांनी मारलं आहे. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. मोदी सरकारनं पाकिस्तान विरोधात कठोर पाऊल उचललं आहे. सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे, अटारी बॉर्डर बंद करण्यात आली असून, पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावर प्रतिक्रिया देतांना भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला खोचक शब्दांमध्ये सुनावले आहे.
२०१४ नंतर दहशतवाद असो किंवा पाकिस्तानच्या कुरापती, आपल्या देशाची प्रतिमा कणखर राहिलेली आहे. हे काय मनमोहन सिंग यांचं सरकार नाही. गांधी परिवाराचं केंद्र सरकार नाही. मोदीजींचं केंद्र सरकार आहे. २०१४ नंतर ज्यांनी आपल्या देशाकडे वाकड्या नजरेनं बघितलं, त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे. पाकिस्तानला मोदीजी असा धडा शिकवतील, की पाकिस्तानचा आबा पण आपल्याकडे वाकड्या नजरेनं बघणार नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
तसेच ते पुढे बोलतांना म्हणाले, की मोदीजींवर विश्वास ठेवला पाहिजे, हे काय मनमोहन सिंगांचे किंवा लिचे-पिचे सरकार नाहीये, हे कणखर देशभक्तांचं, राष्ट्रभक्तांचं सरकार आहे. त्यामुळे पाकिस्तान परत आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत देखील करणार नाही.