पुणे: जम्मू - काश्मीरमधील पहलगाम भागात हिंदू पर्यटकांना लक्ष्य करून भीषण दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये आतापर्यंत २७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ६ महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश आहे. या घटनेचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पडत आहेत. हल्ला झाल्यानंतर भारताने मोठे निर्णय घेतले आहेत. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात सध्या १०० पेक्षा पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे.
दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले जात असतांनाच पुण्यातून ३ नागरिकांनी देश सोडला आहे. तर पुण्यात सध्या १०० पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर या नागरिकांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भारतात व्हिसावर आलेल्या या परदेशी नागरिकांत मुस्लिम, सिंधी व हिंदू समाजाच्या व्यक्तींचा समावेश आहे.
केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत, भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सध्या एकूण १०० पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत. यापैकी ५६ महिला आणि ३५ पुरुष दीर्घकालीन व्हिसावर भारतात आले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
तसेच, २० नागरिक व्हिजिटर व्हिसावर तसेच इतर वेगवेगळ्या कारणासाठी पुण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारच्या आदेशानंतर शहरातील सर्व पाकिस्तानी नागरिकांची माहिती संकलित केली जात आहे. त्यांच्याकडे असलेल्या व्हिसा आणि इतर कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.