मुंबई: आषाढी यात्रेनिमित्त यावर्षी लाखो वारकऱ्यांनी विठुरायाच्या दर्शनासाठी एस.टी.ने सुरक्षित प्रवास केला. वारकऱ्यांच्या सेवेसाठी एस. टी.महामंडळातर्फे १५ जुलै ते २१ जुलै दरम्यान सुमारे ५ हजार विशेष बसेस सोडण्यात आल्या होत्या. या ५ हजार बसेसव्दारे १९ हजार १८६ फेऱ्यांमधून ०९ लाख ५३ हजार भाविक-प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला असून, यातून २८ कोटी ९२ लाखांचे रुपये उत्पन्न एसटीला मिळाले आहे.
आषाढी यात्रेसाठी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती या सहा विभागातून गाडयांचे नियोजन करण्यात आले होते. ५ हजार बसेस वारकऱ्यांच्या प्रवासासाठी एसटीने पंढरपूर येथील वेगवेगळया ४ तात्पुरत्या बसस्थानकांवर तैनात केल्या होत्या. त्याबरोबरच थेट पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने विशेष गाडया सोडल्या होत्या. यात्रेच्या आधी दोन दिवस वाखरी येथील संपन्न झालेल्या रिंगन सोहळयासाठी एसटीकडून २०० बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.