भिवंडी: गणपती विसर्जनाच्या वेळी महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये वाद सुरू झाला होता. महाराष्ट्रातील भिवंडीत गणेश विसर्जनाच्या वेळी यात्रेवर दगडफेक करण्यात आली. यानंतर लोकांनी दगडफेक करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी करत विसर्जन थांबवले. राजस्थानमधील भिलवाडा येथे गणेश मूर्तीच्या विसर्जनानंतर पंडालमध्ये प्राण्यांचे अवयव आढळून आले. यानंतर लोकांनी जोरदार निदर्शने केली. भिलवाडा येथील शाहपुरा भागात शाळा आणि बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
दगडफेकीने मूर्ती फोडली...
महाराष्ट्रातील भिवंडी परिसरात मंगळवारी रात्री उशिरा गणेश विसर्जन मिरवणुकीवर काही लोकांनी दगडफेक केली. यामध्ये मूर्ती खंडित झाली. ठाण्याचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण म्हणाले, की मंगळवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास काही लोकांनी धार्मिक स्थळाजवळ दगडफेक केली, त्यामुळे विसर्जनासाठी जाणाऱ्या मूर्तीची मोडतोड झाली. दगडफेकीचे वृत्त समजताच लोकांनी घटनास्थळ गाठून घोषणाबाजी सुरू केली. दोन्ही बाजूचे लोक जमा झाले. दगडफेक करणाऱ्यांना अटक होईपर्यंत विसर्जन होणार नसल्याचे एका गटाने सांगितले. दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली, त्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. लाठीचार्जमध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जमावाने एका तरुणाला पकडून बेदम मारहाण केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. या तरुणावर मूर्ती तोडल्याचा आरोप आहे.