मुंबई: दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. सामूहिक बलात्कार करुन दिशाची हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी याचिकेतून केला आहे. यामुळे हे प्रकरण आता पुन्हा चर्चेत आलं असून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही या याचिकेत आरोप करण्यात आले होते. पेडणेकरांनी दिशाभूल केल्याचाही आरोपही याचिकेत आहे. आता याच मुद्यावरून भाजचे नेते, मंत्री नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
ही फार सरळ, सोपी केस आहे. ती जर (दिशाची) आत्महत्येची केस होती तर 8 जूनपासून ते आत्तापर्यंत पळापळी का चालली आहे, लपवालपवी का चालली आहे ? आदित्या ठाकरेंना यातून वाचवावं का लागतंय ? असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला आहे. त्यांची जर काहीच इन्व्हॉल्व्हमेंट नसेल तर त्यांची मग एवढी पळापळ का सुरू आहे ? असे ते म्हणाले.
सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आलं होतं की, त्यानुसार, कोणावरही बलात्काराचा चार्ज असेल तर सर्वात पहिले त्याच्याविरोधात केस रजिस्टर करावी लागते. त्या नियमानुसार, केस दाखल करून आदित्य ठाकरेंना अटक करावी, त्यांची चौकशी करावी, ज्याचं ज्याचं नाव याप्रकरणात असेल, जो न्याय अन्य लोकांना लागतो, तोच न्याय आदित्य ठाकरेंना लावावा, अशी आक्रमक भूमिका घेत नितेश राणेंनी अटकेची मागणी केली आहे.
आदित्य ठाकरे असतील, सूरज पंचोली असेल किंवा दिनो मोरिया असेल त्यांची चौकशी करावी, त्यांचा या केसमध्ये काहीच हात नसेल तर चौकशीमध्ये दूध का दूध पानी का पानी का पानी होईल, आम्हा सर्वांची थोबाडं बंद होऊन जातील, असे राणे म्हणाले. ही आत्महत्याच होती, या केसमध्ये काहीच नाहीये माझा हात, मला गोवण्यात येत आहे, असा विश्वास जर आदित्य ठाकरेंना असेल तर फार सरळ सोप आहे. त्यांनी चौकशीला सामोरं जावं, खरं काय ते सांगावं, पुरावे द्यावेत आणि आम्हाला सर्वांना खोटं ठरवावं असं आव्हानही नितेश राणेंनी दिलं आहे.