मुंबई: सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी हे अमेरिका दौऱ्यावर आहे. अमेरिकेत संवाद साधतांना त्यांनी भारतीय निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप केले आहेत. भारतीय निवडणूक प्रक्रियेमध्ये अनेक समस्या आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तर वेळ संपल्यानंतरही मतदान झाले. त्याचा डेटा आम्हांला दिलाचं नाही, असे सांगत खा. राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोग पारदर्शक नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर कडाडून टीका केली आहे.
राहुल गांधी कुणाचा अजेंडा राबवत आहेत? असा संतप्त प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. जगभरात फिरून भारताची बदनामी करून मते वाढणार नाहीत. जनतेत विश्वासर्हता वाढवली तरच मते मिळतील. पण ते करण्याऐवजी ते देशाची बदनामी करत आहेत. महाराष्ट्रात हरले, दिल्लीत हरले, हरियाणात हरले. अतिशय बाळबोध प्रकार आहे. त्यांनी जनतेत जावे आणि भारताची बदनामी करणे बंद करावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले आहे.
कोणताही देशभक्त विदेशात जाऊन देशाची बदनामी करत नाही. असे करण्याऐवजी त्यांनी जनतेत जावे आणि जनतेचा विश्वास संपादन करावा. तरच ते निवडणूक जिंकतील. नाही तर ते जिंकू शकणार नाही. भारताची अशी बदनामी केल्याने त्यांचीच उंची कमी होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
राहुल गांधीनी परदेशात जाऊन भारताची बदनामी केली. भारतीय लोकशाहीची बदनामी केली. भारताच्या संविधानाने तयार केलेल्या लोकशाही संस्थांची बदनामी केली आणि सातत्याने अशा प्रकारे ते बदनामी करत आहेत ही बाब निंदनीय आहे. वारंवार निवडणुकांमध्ये हरल्यानंतर त्यांच्या मनावर परिणाम झालेला दिसतो आहे. पण ते एका विरोधी पक्षाचे नेते असताना आपल्याच देशाची बदनामी विदेशात जाऊन करत असतील तर त्यांच्याविषयी संशय निर्माण होतो की ते नेमका कुणाचा अजेंडा चालवत आहेत? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.