भाईंदर: मिरा -भाईंदरमध्ये टोरेस कंपनी घोटाळ्यानंतर आता नवीन धक्कादायक घोटाळा समोर आला आहे. देशासह राज्यात विविध फसव्या गुंतवणूक योजना आणून नागरिकांची फसवणूक केली जात असतांनाच आता नव्याने नागरिकही अशा फसव्या योजनेच्या नावाखाली दाखवण्यात येणार्या आमिषाला बळी पडत आहेत. मिरा - भाईंदर, वसई - विरार, मुंबई या भागातील नागरिकांना वाहने विकत घेवून ती वाहने भाड्याने लावण्यासाठी गुंतवणूक केल्यास त्याबदल्यात दर महिन्याला भाडे देण्याच्या नावाखाली शेकडो नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरा - भाईंदरमधील पेणकर पाडा, मिरा गावठाण, काशीगाव तसेच इतर भागातील नागरिकांना भवानी मोटर्स नामक कंपनीने वाहन विकत घेऊन भाड्याने लावल्यास त्याबदल्यात दर महिन्याला भाडे देण्यात येईल, असे आमिष दाखवले होते. या आमिषाला बळी पडून शेकडो नागरिकांनी गुंतवणूक केली आहे. या गुंतवणूकीत भाडे मिळाले नाही व मुद्दलही मिळाली नाही. कंपनीने त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे.
भवानी मोटर्स नामक कंपनीचे वसई पूर्वेला डोम्स कॉम्प्लेक्समध्ये कार्यालय आहे. या कंपनीने नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथे होणारी माल वाहतूक आणि कर्मचार्यांची ने - आण करण्यासाठी वाहन पुरवण्याचे कंत्राट मिळाले असल्याचे गुंतवणूकदारांना सांगितले होते. या कंपनीत वाहने भाड्याने लावण्यासाठी अनेक नागरिकांना नवीन गाडी विकत घेवून कंपनीत गाडी लावली असल्याचे सांगितले. तसेच ज्यांचे कर्ज त्यांच्या नावावर होत नाही. त्यांना कंपनीच्या नावे कर्ज घेवून गाडी घेतली जाईल असे सांगितले.
त्या बदल्यात गुंतवणूकदारांना दर महिन्याला ५० ते ६० हजार भाडे देण्याचे आश्वासन देण्यात आले. वाहने भाड्याने लावण्यासाठी काही एजेंट नेमले असल्याचे सांगितले जाते. मिरा - भाईंदरमधील अनेक नागरिकांनी त्या कंपनीला नवीन वाहने विकत घेवून दिली. त्या बदल्यात गुंतवणूकदारांना सुरुवातीला काही महिने वेळेवर भाडे दिले. गुंतवणूकदारांना गेल्या महिन्यापासून कर्जाचा हप्ता, भाडे मिळाले नाही. गुंतवणूकदारांनी भाड्याची मागणी केली असता, त्यांना लवकरच भाडे देण्यात येईल असे सांगण्यात आले.
भाडे मिळत नसल्याने गुंतवणूकदारांनी माहिती घेतली असता कंपनीला देण्यात आलेली वाहने जेएनपीटी येथे न वापरता ती वाहने मुंबईतील एका पार्कींगमध्ये उभी असल्याचे दिसून आले. अनेक गुंतवणूकदारांनी स्वतःच्या नावे कर्ज घेवून वाहन विकत घेतले होते. तर ज्यांचे त्यांच्या नावावर बँक कर्ज देत नाही, अशा अनेक गुंतवणूकदाराकडून भवानी कंपनीच्या नावे कर्ज मंजूर करत, वाहन खरेदीसाठी बुकिंग रक्कम घेण्यात आली.
बुकिंग घेतल्यानंतर वाहन खरेदी करण्यात आलेच नाही. गुंतवणूकदारांनी स्वतःचे नावे कर्ज घेवून वाहन खरेदी करून कंपनीला दिले होते. तीच वाहने बुकिंग घेणार्या गुंतवणूकदारांना दाखवली जात होती. ते वाहन खरेदी करून कंपनीत भाड्याने लावल्याचे दाखवले जात होते. वाहन खरेदी न करता बुकिंग घेवुन आपली आर्थिक फसवणूक केली असल्याचे तक्रादारांना आढळून आले आहे.फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेकडो नागरिकांनी काशिमिरा पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार दाखल केली होती.
त्यावरून कंपनीच्या दिव्यता, रोहन म्हात्रे, दक्षता मयेकर, प्रवीण तेलंग, वैशाली धुरी, नीलेश शिंदे, बाबू आव्हाड या सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कंपनीचा प्रमुख राजू जोशी हा फरार आहे. यांच्यावर फसवणूक व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काशीमीरा पोलीस ठाण्यात जवळपास १०० पेक्षा जास्त गुंतवणूकदारांनी तक्रार दिली आहे. यामध्ये आणखी मोठ्या प्रमाणात गुंतवणुकदार असल्याने हा आकडा वाढणार आहे.