पुणे: धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या ३३६ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र वढू व तुळापूर येथे बलिदान दिन मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची विधीवत पूजा, महाभिषेक व शासकीय मानवंदना करण्यात आली. विविध सांस्कृतिक, धार्मिक व इतिहास प्रेरित कार्यक्रमांनी संपूर्ण वातावरण वीरमय आणि भक्तिमय झाले.
या ऐतिहासिक बलिदान दिनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महंत रामगीजी महाराज, अक्षय महाराज भोसले, स्वामी भारतानंद सरस्वती महाराज, गोरक्षक मिलिंद एकबोटे, आ. महेश लांडगे, आ. माऊली तटके यांच्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवप्रेमी व शंभूभक्तांनी उपस्थिती लावली.
वढू व तुळापूरच्या पवित्र भूमीवर भाविकांनी उसळलेला जनसागर बघता इतिहास पुन्हा नव्याने जागृत झाल्यासारखे वाटले. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या छावा या चित्रपटाने देखील तरुणाईला या कार्यक्रमाकडे आकर्षित केले. त्यामुळे तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेत धर्मवीर संभाजी महाराजांना कृतज्ञतेची मानवंदना अर्पण केली.
कार्यक्रमाच्या दरम्यान गगनभेदी घोष, 'धर्मवीर संभाजी महाराज की जय' च्या जयघोषांनी आकाश निनादून गेले आणि संपूर्ण परिसरात वीरश्री व भक्तिभावाचा अद्वितीय संगम पहायला मिळाला.