वर्धा: शरद पवारांनी वर्धेत आमचं स्वप्न पूर्ण करुन दाखवलं आहे. जी गोष्ट आम्हांला जमली नाही, ती त्यांनी करुन दाखवली, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. बुधवारी भाजप नेते रामदास तडस यांनी वर्धेतून लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरला यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. या सभेत फडणवीस यांनी शरद पवारांचे आभार मानले आहे. त्यांचं हे भाषण राजकीय वर्तुळात चर्चेचं ठरलं आहे.
मंगळवारी वर्धेत शरद पवारांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी भाजपची सभा पार पडली. यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "काल शरद पवार याठिकाणी येऊन गेलेत. जी गोष्ट आम्हांला जमली नाही, ती पवार साहेबांनी करुन दाखवली, यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आम्ही काँग्रेसमुक्त वर्धाचा नारा दिला. जिल्हा परिषद जिंकलो. एक सोडून सगळ्या आमदारकीच्या जागा जिंकल्या, नगरपरिषदही जिंकली पण आम्हांला पंजा मात्र गायब करता आला नाही. शरद पवारांनी वर्धेतून पंजा गायब केला यासाठी मी त्यांचे आभार मानतो. ज्या महात्मा गांधींचे नाव सांगून काँग्रेसने इतकी वर्ष राजकारण केलं, त्याच वर्धेतून काँग्रेसला हद्दपार करण्याचं काम पवारांनी केलं, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो," असे ते म्हणाले.
मोदींनी गरीब कल्याणाचा अजेंडा या देशात राबवला. मोदींनी जादू काय केली हे जगातल्या अर्थतज्ज्ञांना कळू शकलेलं नाही. २५ कोटी गरीब दारिद्र्य रेषेमखालून बाहेर आहे. सगळ्या जगाला याचं कौतुक आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. आज रामदास तडस यांचा अर्ज भरण्यात आला. त्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार भाषण केलं. तसेच त्यावेळी त्यांनी काँग्रेसमुक्त वर्धा केल्याबद्दल शरद पवारांचे खोचकपणे आभार मानले.