मुंबई: आदित्यचे नाव न घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दोनदा दूरध्वनी करून विनंती केली. भाजपा खासदार नारायण राणे यांचा हल्लाबोल महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पोलिसांना हाताशी धरत दिशा सालियान मृत्यू प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊ नये अशी विनंती करणारे दूरध्वनी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दोनदा केले होते, असा दावा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ खासदार नारायण राणे यांनी शनिवारी केला. आता दिशाच्या वडिलांवर दबाव नसल्याने त्यांनी न्यायासाठी कोर्टाकडे धाव घेतली असेही त्यांनी नमूद केले. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असून पोलिसांनी पुरावे असूनही तेव्हा कारवाई का केली नाही असा सवालही खा. राणे यांनी यावेळी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते.
यावेळी खा. राणे म्हणाले की तत्कालिन महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाच्या वडिलांवर दबाव टाकला होता. या दबावामुळेच त्यांना त्यावेळी तशी प्रतिक्रीया देण्यास भाग पाडले. हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा कर्ता करविता निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे होता, असा आरोपही श्री. राणे यांनी केला. सरकारने आता नव्याने एफआयआर दाखल करून आरोपींना अटक करावी अशी मागणी ही त्यांनी केली.
दिशाच्या वडिलांनीच कर्तव्यात कसूर करणा-या पोलिस अधिका-यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे असे सांगत खा.राणे म्हणाले की पोलीस आयुक्तांनी संबंधित अधिका-यांना त्यावेळी केलेल्या दिरंगाई बद्दल जाब विचारावा आणि दोषी अधिका-यांना निलंबित करावे. दिशा सालियानला न्याय मिळायलाच हवा आणि आरोपीला कडक शिक्षा व्हावी, असेही खा. राणे यांनी नमूद केले.