छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणी प्रश्नावर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने महानगरपालिकेच्या झोननिहाय अधिकाऱ्यांना आज २१ एप्रिल रोजी निवेदन देण्यात येणार होते. संबंधित झोनच्या अधिकाऱ्यांना याची शिवसेना महिला आघाडीच्या वतीने पूर्व कल्पनाही देण्यात आली होती.मात्र निवेदन सादर करतेवेळी संबंधित अधिकारी गैरहजर राहिल्याने शिवसेना महिला आघाडीच्या वतीने मनपा झोन कार्यालयासमोर लबाड सत्ताधाऱ्यांबरोबर लबाडी करणाऱ्या झोन अधिकारी आणि पाणी पुरवठा उपअभियंता यांच्या विरोधात बोंबमारो आंदोलन करण्यात आले.
"लबाडांनो पाणी द्या" पाणी प्रश्नांचे निवेदन न घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो अशा जोरदार घोषणाबाजी करत शिवसेना महिला आघाडीच्या वतीने परिसर दणाणून सोडवण्यात आला. महिला आघाडीच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करून बोंबमारो आंदोलन सुरू केल्यानंतर संबंधित अधिकारी खडाडून जागे झाले. धावपळ करत अधिकारी झोन कार्यालयात हजर राहत शिवसेना महिला आघाडीचे संभाजीनगर पाणी प्रश्नांवरील निवेदन घेतले. मनपा अधिकारी यांनी शहराच्या पाणी प्रश्नावरील निवेदन न घेण्याचा केलेला आटोकाट प्रयत्न महिला आघाडीने हाणून पाडत शिवसेनेची ताकद दाखवून दिली.
छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणी पुरवठ्याची दुरावस्था सर्वश्रुत आहे. सध्या शहरात पाणी दोन ते तीन दिवसांनी अकरा ते बारा दिवसांनी येत असून, त्याची शाश्वतीही नाही. जायकवाडी ते शहरापर्यंतच्या पाणीपुरवठा योजनेचे काम कासवगतीने सुरू आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत पाणी देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन फोल ठरले आहे. योजनेची किंमत १६८० कोटीवरून २७४० कोटीवर गेली असून, ८५० कोटीचा अतिरिक्त भार महानगरपालिकेवर आणि पर्यायाने नागरिकांवर पडत आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात या योजनेला गती आणि पूर्ण निधी मिळाला होता. मात्र, सध्याच्या सरकारने ही योजना थंड बस्त्यात टाकली आहे. परिणामी, नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. दररोज प्रती व्यक्ती १३५ लिटर पाणी देण्याच्या घोषणा केवळ गप्पा ठरल्या असल्याची माहिती निवेदनात देण्यात आली.
शिवसेना महिला आघाडीच्या वतीने केलेल्या मागण्या...
१. पाणीपुरवठा योजनेचे काम त्वरित पूर्ण करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा.
२. महानगरपालिकेवर लादलेला ८५० कोटींचा अतिरिक्त आर्थिक भार रद्द करावा.
३. पाणीपुरवठ्याची वेळ आणि वारंवारता निश्चित करून नागरिकांना दिलासा द्यावा.
पाणी प्रश्न शहरवासीयांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे. याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जनतेच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे. आम्ही "लबाडांनो पाणी द्या" मोहिमेद्वारे जनजागृती करत आहोत आणि यावर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. कृपया तातडीने कार्यवाही करून शहराला पाण्याच्या दुर्भिक्ष्यातून मुक्त करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.