धुळे: मुंबई - आग्रा महामार्गावरील लळिंग किल्ला परिसरात कापूस व्यापाऱ्यांची लूट करणाऱ्या दोन आरोपींच्या मुसक्या धुळे पोलिसांनी आवळल्या आहेत. या दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी तब्बल ७ लाख ४८ हजार रुपये हस्तगत केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींचा आणखी एक साथीदार फरार असून त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
अटकेत असलेल्या आरोपींनी मुंबई - आग्रा महामार्गावरील लळिंग किल्ला परिसरात दोन कापूस व्यापाऱ्यांची लूट केली होती. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. बंटी शांताराम अहिरे आणि रवींद्र राजेंद्र वाघ अशी या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कापूस विक्रीचे पैसे घेऊन दोन व्यापारी ९ डिसेंबर मुंबई - आग्रा महामार्गावरून प्रवास करत असताना लळिंग किल्ला परिसरात काही अज्ञातांनी त्यांना अडवले व धारदार शस्त्राने वार करत त्यांना जखमी केले आणि त्यांच्याकडून तब्बल १३ लाख १५ हजार रुपयांची रोकड लुटून संबंधित आरोपी पसार झाले होते. याप्रकरणी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तसेच एक आरोपी अद्यापही फरार असून त्याच शोध सुरु आहे, असे धुळे पोलिसांनी सांगितले आहे.
अटकेत असलेल्या आरोपींनी कापूस व्यापाऱ्यांना मुंबई - आग्रा महामार्गावरील लळिंग किल्ला परिसर गाठत लूट करण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. व्यापाऱ्यांना जखमी केल्यानंतर त्यांच्याकडील रोकड रक्कम तब्बल १३ लाख १५ हजार रूपये लुटले आणि पसार झाले. या प्रकरणी मोहाडीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
त्यानंतर पोलिस अधिक्षक श्राकांत धिवरे यांनी तपास टिम गठित करत आरोपींचा शोध सुरु केला. परिसरातील खबरींना आरोपींची माहिती काढण्याची सूचना दिल्या त्यानुसार, त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, मोहाडी पोलिसांनी मोहाडी उपनगर परिसरातून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. तसेच यांच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.