धुळे: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शासनामार्फत निघालेल्या अध्यादेशाबाबत पणन मंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. प्रत्येक तालुक्यात बाजार समिती, असं आवाहन आम्ही केलं होतं. प्रत्येक तालुका बाजार समिती ही योजना कंपल्सरी योजना नसून, काही तालुक्यांमध्ये प्रयत्न करून देखील बाजार समिती तयार होऊ शकली नाही अशा तालुक्यांमध्ये बाजार समिती तयार करायची आहे," असं राज्याचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले.
विधानमंडळाच्या २०२५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्र्यांनी 'एक तालुका एक बाजार समिती' योजनेची घोषणा केली होती. या योजनेत राज्यातील ६८ तालुक्यांमध्ये बाजार समित्या स्थापनेसाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आले होते. त्यामुळे आता प्रत्येक तालुक्यात एक स्वतंत्र बाजार समिती स्थापन केली जाईल. हे शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणेल. यावर आता मंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
जयकुमार रावल हे धुळे जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. तसंच त्यानंतर जयकुमार रावल यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी "ज्या तालुक्यात बाजार समिती व्यवस्थित सुरू असेल त्या ठिकाणी आग्रह नसून, जिथे आवश्यकता असेल तिथे बाजार समिती होईल," अशी माहिती मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे.