मुंबई: गोहत्या प्रकरणी वारंवार गुन्हे नोंद होत असतील, तर अशा लोकांवर संघटित गुन्हेगारी कायदा (मकोका) अंतर्गतही गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिला. आ. संग्राम जगताप यांनी श्रीगोंदा तालुक्यातील ससाणेनगर भागात घडलेल्या वाद, मारहाण, त्यातून मृत्यू होणे, तसेच तेथील कुरेशी कुटुंबियांची दहशत, यासंबंधी लक्षवेधी सूचना विचारली होती. त्यावरील उत्तरात मुख्यमंत्री बोलत होते.
फटाके वाजवण्यावरुन मातंग समाजातील ससाणे आणि इतर अकरा लोकांना मारहाण झाली. त्यानंतर ससाणे यांच्या मृत्यू झाला. सव्वा महिन्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला, याबाबत संग्राम जगताप सभागृहात बोलत होते. येथे आणि संपूर्ण जिल्ह्यात गोतस्करी, गोहत्या यासह अनेक व्यवसाय असलेल्या कुरेशी गँगची दहशत आहे. कुरेशीवर १८ ते २० गुन्हे दाखल आहेत, असे जगताप यांनी निदर्शनास आणले. या सर्व प्रकरणी स्थानिक पोलीस निरीक्षक यांचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. तसेच गोहत्या, गोतस्करी विरोधात कठोर कायदा करण्याची मागणी केली.
त्यावर गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर म्हणाले, या प्रकरणी कुणीही गुन्हा नोंद करण्यास पुढे न आल्याने पोलिसांनी स्वतः गुन्हा नोंद केला. एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला, पुढील कारवाई सुरू आहे. गोतस्करी होत असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल असे, उत्तर त्यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेऊन, वारंवार गोहत्या संबंधी गुन्हे नोंद होत असतील, तर मकोका अंतर्गत कारवाई होईल, असे जाहीर केले.