दिल्ली: पाकमध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने अपहरण केलेल्या जाफर एक्सप्रेसमागे भारताचा हात असल्याचा आरोप पाकने केला होता. भारताने मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन प्रसारित करून म्हटले आहे, की जगाला ठाऊक आहे, की आतंकवादाचे केंद्र कुठे आहे? पाकिस्तानने स्वतःच्या अंतर्गत समस्या आणि अपयश, यांसाठी इतरांकडे बोटे दाखवण्याऐवजी आणि इतरांना दोष देण्याऐवजी आत्मपरीक्षण करावे.
पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी दावा केला होता, की जाफर एक्सप्रेसच्या घटनेत सहभागी असलेले बंडखोर अफगाणिस्तानातील त्यांच्या सूत्रधारांच्या संपर्कात होते. अपहरण केलेली रेल्वे सोडवल्याचा पाकिस्तानी सैन्याचा दावा बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने आधीच फेटाळला आहे. या संघटनेने निवेदन प्रसारित करून म्हटले आहे, की जर पाकिस्तानी सैन्याने खरोखरच ओलिसांना सोडवले असेल, तर ते त्या ओलिसांची छायाचित्रे का प्रसिद्ध करत नाही?