मुंबई: महाराष्ट्र सरकारने देशी गायींना ‘राज्यमाता - गोमाता’ म्हणून घोषित करण्यास मान्यता दिली आहे. महाराष्ट्र शासनाने ३० सप्टेंबर या दिवशी याविषयीचा शासन आदेश काढला आहे. देशी गायींचे भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून असलेले स्थान, देशी गायींच्या दुधाची मानवी आहारातील उपयुक्तता, आयुर्वेद चिकित्सापद्धती, पंचगव्य उपचारपद्धती, तसेच गायींचे शेण आणि गोमूत्र यांचे सेंद्रिय शेतीमधील महत्त्वाचे स्थान विचारात घेऊन देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्यात आल्याचे शासनाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
देशी गायीच्या दुधाचे मानवी आहारात पौष्टिकदृष्ट्या महत्त्व आहे. त्यामुळे गायीच्या दुधाला ‘पूर्णअन्न’ म्हटले जाते; परंतु दिवसेंदिवस देशी गायींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. त्यामुळे पालनपोषणास प्रेरणा मिळावी, यासाठी देशी गायींना ‘राज्यमाता - गोमाता’ घोषित करण्यात येत असल्याचे शासनाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.